Shrirampur Award | आनंदवन येथे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
आनंदवनात कामाचे बोलायचे नाही तर त्यांचे काम हेच बोलणे आहे. आनंदवनात गेलो की एक ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा वर्षभर टिकून राहते. बाबांनी निर्माण केलेले आनंदवन हे समाजसेवेचे स्फुल्लिंग चेतवणारे विद्यापीठ असल्याचे मत सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील समाजसेवा पुरस्कार आनंदवन येथील महारोगी सेवा समितीला जडणघडणचे संस्थापक संपादक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. भारती आमटे यांना प्रदान करण्यात आला.
सन्मानपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सातारा येथील रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्रद्धेय बाबा आमटे व ऍड. रावसाहेब शिंदे यांच्यातील सत्कारापेक्षा सतकार्य या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सुखदेव सुकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे हे होते.
त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ज्या कुष्ठरोगांसाठी काम करायचे तीच माणसे सोबत घेऊन बाबांनी काम उभे केले व जगाला दाखवून दिले. केलेले कार्य चिरकाल टिकून राहते हे आनंदवनाने दाखवून दिले आहे. बाबानंतर आज त्यांची तिसरी पिढी अव्याहतपणे आनंदवनाचे कार्य जोमाने करीत आहे.
यामुळे पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळतो. आनंदवन हे विचारांचे एक ऊर्जा केंद्र असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजाला काहीतरी नवीन द्यायचे असते या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
याप्रसंगी ह.भ.प. सखाराम कर्डिले महाराज, विश्वस्त सुधाकर कडू गुरुजी, कवीश्वर काका, सदाशिव ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य दीपक शिव यांनी केले. तर विद्या निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगंटीवर यांनी सन्मानपत्राचे वाचन व आभार मानले.
वृत्त डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com