पाऊलबुद्धे फार्मसीमध्ये एक दिवसीय विद्याशाखा विकास कार्यक्रम संपन्न

इंटरनेट, सोशल मिडिया यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढत आहे त्यामुळे  शिक्षकांना अपडेट राहणे आवश्यक
- डॉ.रेखाराणी खुराणा


Dr Paulbudhe College: शिक्षकांना अपडेट राहणे आवश्यक - डॉ.रेखाराणी खुराणा



    अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रभावशाली शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात राहत असते. त्यासाठी शिक्षकांनी आपला व्यक्तिमत्व विकास करावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असावा. शिकवण्याची पद्धत, शिक्षकांचे शिकवणे परिणामकारक कसे होईल यावर भर द्यावा. 



पूर्वीचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी यामधील झालेला बदल लक्षात घेता शिक्षकाने स्वतःमध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे. इंटरनेट, सोशल मिडिया यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढत आहे. त्यांच्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी आज बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार शिक्षकांना अपडेट राहणे आवश्यक झाले आहे, असे प्रतिपादन  डॉ. रेखाराणी खुराणा यांनी केले.




     सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये नुकताच फॅकल्टी डेव्हलमेंट प्रोग्राम अंतर्गत विद्याशाखा विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन साई पाउलबुधे व डॉ.श्रद्धा पाउलबुधे यांनी केले. प्रारंभी मुख्य वक्त्या बी.एड .कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी  बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. निलेश जाधव आणि डी फार्मसी च्या प्राचार्या अनुराधा चव्हाण तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.



     शिक्षकांचे शिष्टाचार, शिकवण्याच्या पद्धती आणि चांगल्या शिकवण्याच्या पद्धती वाढवणे यावर भर देत शिक्षकांचा विकास कसा होईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले.



     याप्रसंगी प्रा.अमृता रत्नपारखे म्हणाल्या, शिक्षकांनी ज्ञान  अद्यावत ठेवले पाहिजे चांगले ज्ञान असेल तरच चांगले संप्रेषण होऊ शकते. विद्यार्थ्यांना काय हवे आहे ते त्यांच्याकडून जाणून घेतले पाहिजे व त्यानुसार अध्यापन केले पाहिजे, अशा अनेक गोष्टीवर उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.



     प्रा.डॉ.प्राची मचे  यांनी  प्रश्न कौशल्य प्रस्तावना कौशल्य चांगले स्पष्टीकरण याविषयी माहिती दिली. प्रा.अपर्णा केसकर यांनी विद्यार्थ्यांची आकलन शक्ती कशी वाढवावी,यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे  सांगितले. प्रा.आशा कवाणे  यांनी प्रयोगशील अध्यापनाची तंत्र समजावून सांगत विद्यार्थ्यांना कोणत्या अध्यापन पद्धतीने शिकवायचे हे सांगितले. 



प्रा.स्मिता चासकर यांनी शिक्षक एक अध्ययन व्यवस्थापक म्हणून कसा काम करू शकतो. शिक्षक एक चांगला प्लॅनर असावा. वर्गात अध्ययनास पोषक पोषक वातावरण निर्माण कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. प्रा.मृदूला  गोरे यांनी अध्यापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आकर्षक फलक लेखन आदि रिसोर्सेस यांचा वापर कसा करावा हे सांगितले.




     पॉलिटेक्निक कॉलेज नारायणडोहचे प्रा. सागर बोठे सर यांनी आपल्या मनोगतात हा परिसंवाद आमच्यासाठी चांगला उपयोगात येईल आणि शिक्षकांमध्ये यामुळे खूप चांगला बदल होईल असे  सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. वेणू कोला, डॉ.प्रसाद घुगरकर, प्रा.दुर्गेश पवळे, श्रद्धा मुंदडा आदींनी परिश्रम घेतले.  सूत्रसंचालन प्रा. प्रणाली अनमल व प्रा.डॉ. श्याम पंगा यांनी केले. आभार प्रा. स्वाती कडनोर यांनी मानले.