Vanchit: अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार : नाना पटोले 

Maharashtra News: अजूनही आम्ही वंचितला दोस्तीचा हात पुढं करायला तयार : नाना पटोले



वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहेत. महाविकास आघाडीशी जागावाटपाची (Maha Vikas Aghadi Seat Sharing) चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी बाहेर पडण्याची घोषणा केली. 


त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Constituency) आपले उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले हे भंडाऱ्यात (Bhandara) बोलत होते. 


यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की, "मी स्वतः अकोल्यात गेलो, प्रकाश आंबेडकर यांना मी सांगितलं की, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार आहोत. 



हैद्राबादच्या ओवेसींनी मुस्लिमांच्या मतांचं विभाजन केलं, यांनी मागासवर्गीयांचं मतं कमी केलं. कालपण सांगून आलो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तयार आहोत. मतांचं विभाजन नको," असेही पटोले म्हणाले. 


पुढे बोलतांना नाना म्हणाले की, "त्यांनी तर माझा खूप अपमान केला. वाटाघाटीच्या बैठकीसाठी जेव्हा मी बसायचो तेव्हा माझा अपमान केला जात होता. मी काल अकोल्यात सांगितलं की, माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. 


माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे, हे नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे. म्हणून मी काल खुल्या मनानं अकोल्यात त्यांना आवाहन केलं. पण, त्यांच्या मनात मत विभाजनाचं, भाजपलाचं जिंकवायचं असेल तर ते त्यांच्या मनातील गोष्ट असल्याचे" नाना पटोले म्हणाले.