शिर्डी प्रमाणे नगर एमआयडीसी विस्तारीकरणासाठी देखील तातडीने रू. १०० कोटी मंजूर करण्याची उद्योग मंत्री ना.उदय सामंतांकडे किरण काळेंची मागणी

Ahmednagar Congress: शिर्डी प्रमाणे अहमदनगर एमआयडीसीसाठी १०० कोटीची उद्योगमंत्री सामंत यांना काळेंची मागणी


 


अहमदनगर (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने काल मंगळवार दि. ३० जुलै २०२४ रोजी मुंबई येथे नगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय पाटील यांच्या पाठपुराव्यातून आणि उपस्थितीत झालेल्या बैठकीत विखे पाटील यांच्या मागणीवरून शिर्डी एमआयडीसीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी रू. १०० कोटींच्या निधीला मान्यता दिल्याची माहिती स्वतः डॉ. विखे पाटील यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे. शिर्डी प्रमाणे नगर शहरालगत असणाऱ्या वडगाव गुप्ता एमआयडीसीच्या विस्तारीकरणाकरिता देखील रु.१०० कोटींचा निधी तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, शहराचे आ. संग्राम जगताप यांना देखील काळे यांनी सदर निवेदनाची प्रत पाठवली आहे. काळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, शिर्डीच्या मंजुरीसाठी आपले मी अभिनंदन करतो. मात्र त्याच वेळी आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर शहर विधानसभा क्षेत्रा लगत असणाऱ्या वडगाव गुप्ता एमआयडीसीसाठी एक दमडी देखील मंजूर न केल्याबद्दल आपला मी अहमदनगर  शहरातील बेरोजगार युवक - युवती, नगर शहरातील उद्योजक व तमाम नागरिक आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करीत आहे. कारण शिर्डी आणि नगर शहरा लगतच्या वडगाव गुप्ता एमआयडीसीची घोषणा मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये स्वतः तत्कालीन खा.डॉ. विखे पाटील यांनी स्वतः करत यासाठी त्यांनी व शहराचे आ. जगताप यांनी (नगर करीता) यासाठी पाठपुरावा केल्याचे नगरकरांना जाहीररीत्या सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त शिर्डी या नगर उत्तरेतील एमआयडीसी साठीच पाठपुरावा केला. 

जनतेने त्यांचा पराभव केला. धनशक्ती पेक्षा जनशक्ती मोठी आहे हे दाखवून दिले. मात्र पराभव होताच त्यांनी आपली नगरकरां वरील माया पातळ केली. हे दुर्दैवी आहे. त्यांच्या व राज्यातील महायुतीच्या या भूमिकेमुळे माझ्या नगर शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि उद्योजक यांचे नुकसान झाले आहे. चुनावी जुमल्यामुळे त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली आहे. 

विशेष म्हणजे अहमदनगर एमआयडीसी विस्तारीकरणाची घोषणा करत असताना, तत्कालीन खा. विखे व शहराचे आ. जगताप यांनी म्हटले होते की, अहमदनगर  शहरालगत असणाऱ्या वडगाव गुप्ता येथील महाराष्ट्र शासनाची ६०० एकर म्हणजेच सुमारे २२५ हेक्टर आर जमीन फेज-२ साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल, तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली. 

काळे यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, वडगाव गुप्ता एमआयडीसी मुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असा दावा विखे आणि जगताप यांनी त्यावेळी केला होता. औद्योगिक वसाहतीच्या विस्तारा करिता विखे, जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मोठे यश मिळाल्याचा दावा करत त्यांनी श्रेय घेतले होते. मात्र ती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरील केवळ नौटंकी होते हे आता आपल्या आणि महायुती सरकारच्या कृतीतून स्पष्ट झाले आहे. 

त्यामुळे शहराच्या स्थानिक शहर लोकप्रतिनिधींना देखील नगर शहरातील युवकांच्या रोजगाराची आणि येथील उद्योजकांच्या विकासाची चिंता नसली तर देखील मला हा प्रकल्प होणे अत्यंत आवश्यक वाटते. यासाठी शिर्डी प्रमाणे अहमदनगर  वडगाव गुप्ता एमआयडीसी करिता देखील १०० कोटी रुपयांचा निधी रस्ते, वीज व एमआयडीसीच्या अन्य विकासात्मक कमां करिता तात्काळ मंजूर करावा अशी मागणी त्यांनी उद्योग मंत्र्यांकडे केली आहे.