Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं

Lonavla Bhushi Dam : धबधब्यात खडकावर उभे राहिले, काही क्षणात पाणी वाढलं ; संपूर्ण कुटुंबच वाहून गेलं



लोणावळा : सय्यदनगर हडपसरच्या  एकाच कुटुंबातील सात जण भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दोघांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडता आल्याने ते बचावले. मात्र, चार लहान मुलांसह एक महिला वाहून गेली. 


त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाने शोधले, तर दोघे बेपत्ता होते. या घटनेमुळे अन्सारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ताम्हिणी येथे धबधब्यात पुण्यातीलच एक तरुण वाहून गेला. २४ तासात दोन घटनांत एकूण आठ जण वाहून गेले. त्यामध्ये दोघ जण वाचले; तर तिघांचे मृतदेह सापडले असून, तिघे बेपत्ता आहेत.


नूर शाहिस्ता अन्सारी (वय ३५), अमिना अदिल अन्सारी (वय १३), मारिया अन्सारी (वय ७), हुमेदा अन्सारी (वय ६) आणि अदनान अन्सारी (वय ४, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) अशी भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. यामध्ये मारिया आणि अदनान अद्याप बेपत्ता असून, उर्वरित तिघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यदनगर येथील अन्सारी परिसरातील १५ ते १६ जण रविवारच्या सुटीचे औचित्य साधून लोणावळ्यात वर्षाविहारासाठी सकाळी आले होते. ते सर्व जण १२ वाजे दरम्यान लोणावळ्यातील भुशी धरणाच्या मागील बाजूच्या धबधब्याकडे गेले होते. या ठिकाणी एकूण मोठे धबधबे असून त्यांचा संगम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतो.


अन्सारी परिवारातील सदस्य एका धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटत होते. त्या वेळी भुशी डॅमच्या परिसरात आणि पठारावर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धबधब्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली. मात्र, त्याची कल्पना अन्सारी कुटुंबीयांना आली नाही. काही कळण्यापूर्वीच पाण्याचा मोठा प्रवाह आला आणि सर्व जण अडकले. मदतीच्या अपेक्षेने काठावरील लोकांकडे पाहणारे अन्सारी कुटुंबीय पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी एक मुलगी आणि एक पुरुष वाचले.

लग्नसोहळ्याच्या निमित्ताने अन्सारी कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र आले होते

अन्सारी कुटुंबीय आणि नातेवाईक लग्नसोहळ्याच्या निमित्ताने  एकत्र आले होते. चार दिवसांपूर्वी लग्न झाले. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, आनंदी कुटुंबावर रविवारी दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नासाठी आग्रा येथून नातेवाईकांसह अन्सारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्याला गेले. मात्र, धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने अन्सारी कुटुंबातील दहा जण वाहून गेले. पाच जण सुखरूप बाहेर पडले. मात्र, पाच जण वाहून गेले. तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले असून, दोघे बेपत्ताच आहेत.