अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त लालटाकी येथे अभिवादन

Annabhau Sathe Jayanti | अण्णाभाऊंचे साहित्य ही समाज बदलाची प्रेरणा आहे - महादेव नेटके



     


नगर : दर्शक । 

 अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे वंचित, शोषित समाजाला आवाज दिला. त्यांचे पोवाडे, कथा आणि लावण्या या केवळ मनोरंजनासाठी नसून त्या सामाजिक जागृतीचे शक्तिशाली माध्यम आहेत. आजही त्यांच्या लिखाणातून गरिबी, अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते महादेव नेटके यांनी केले.




     साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुधीर बोरगे, महादेव नेटके, दिनेश वैरागर, अशोक बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.



     नेटके पुढे  म्हणाले, समाज बदलायचा असेल तर अण्णाभाऊंचा विचार वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. 



त्यांच्या संघर्षातून आणि जीवनातून आपण शिकण्यासारखे खूप काही आहे. अहिल्यानगरमध्ये अण्णाभाऊंचा विचार पोहोचवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू. हे आमचं कर्तव्य आहे आणि तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.