मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेतील त्रुटी तात्काळ दूर करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
अहिल्यानगर — शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेच्या (एसआयआर) अंमलबजावणीत गंभीर त्रुटी आहेत. मतदार यादी अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात अनेक अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. तसेच शहर विधानसभा मतदार यातीदील श्रीगोंदा - नगर तसेच राहुरी - नगर - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील बोगस नावे वगळण्याची मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या तक्रारींचे निवेदन विरोधी पक्षांच्या वतीने देण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, राम वाणी, राम झिने, चंद्रकांत उजागरे, संजय कांबळे, राम धोत्रे, उषा भगत, शारदा वाघमारे, मीना रणशूर, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, विनोद शिरसाट, माजी नगरसेवक फैयाज शेख, हाफिज सय्यद, धनंजय देशमुख, गणेश आपरे, आकाश आल्हाट आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, घरपोच पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता नावांची पडताळणी केल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे बोगस नावे कायम राहण्याची आणि खऱ्या मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, डेटा एन्ट्री दरम्यान नाव, वय व पत्त्यात मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. अभियानाबाबत जनजागृतीचा अभाव ही देखील गंभीर बाब आहे. अनेक मतदारांना या प्रक्रियेची माहितीच नाही.
तसेच नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवर वेळेत निर्णय होत नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आहे. कर्मचाऱ्यांवर दुहेरी जबाबदाऱ्या टाकल्यामुळे कामावर ताण वाढून अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. स्थलांतरित कामगार व भाडेकरू मतदारांच्या नोंदीत ही विसंगती दिसून येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व त्रुटी तात्काळ दूर करून पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने एसआयआर अभियान राबवावे, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
शहरा बाहेरील "ती" नावे वगळा :
किरण काळे म्हणाले, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर करताना श्रीगोंदा - नगर तसेच राहुरी - नगर - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील हजारो नावांचा समावेश निवडणूक यंत्रणा हाताशी धरून राजकीय हस्तक्षेपातून शहराच्या यादीत करण्यात आला आहे. त्या वेळेस आम्ही त्यावर हरकत घेत नावे वगळण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. आता तरी शहरा बाहेरील ती बोगस नावे वगळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com