तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया 'या दिवशी' सुरू होणार
अहमदनगर – शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी न्यायालयाच्या निकालानंतर जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवारी या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल.
दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया उद्या २३ जुलैपासून सुरू होणार असल्याने २५ टक्के मोफत प्रवेशाची वाट पाहणार्या पालक आणि विद्यार्थी आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहेत.
दरम्यान, नगर जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ३२७ शाळा पात्र असून याठिकाणी ३ हजार २६ जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. याठिकाणी ९ हजार ६२६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातून ऑनलाईन सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही मोफत प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा ही मोफत प्रवेश प्रक्रिया न्यायालयात अडकली होती. फेब्रुवारी महिन्यांत शिक्षण विभागाने या मोफत प्रवेशाबाबत सुधारित आदेश काढले होते. या आदेशा विरोधात उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपिठात जनहित याचिका दाखल झाली होती. त्यानूसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात आली.
त्यानंतर आजपासून मोफत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येणार आहेत. हे एसएमएस मिळणार्या पालकांनी त्यांच्या पाल्याची निवड झालेल्या शाळेत २३ ते ३१ जुलैदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com