जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा शांती ज्युनियर्समध्ये उत्साहात संपन्न

Nagar Chess | "बुद्धिबळामुळे विचारशक्ती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो" : आमदार संग्राम जगताप


नगर – जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने ११ वर्षांखालील मुला-मुलींकरिता आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा  शांती ज्युनियर्स प्रि-स्कूल, प्रोफेसर चौक, सावेडी येथे यशस्वीरीत्या पार पडली.


या स्पर्धेचे प्रास्ताविक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे यशवंत बापट यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी आ.जगताप यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना बुद्धिबळाचे महत्त्व विषय केले. 


"बुद्धिबळ हा खेळ केवळ मनोरंजनासाठी नसून, विद्यार्थ्यांच्या एकाग्रता, कल्पकता, आणि निर्णयक्षमता वाढवणारा महत्त्वाचा मार्ग आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक विकासासाठी अशा बुद्धिमान खेळांकडे वळणे आवश्यक आहे. 





बुद्धिबळामुळे विचारशक्ती, संयम, आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो. आपल्या जिल्ह्यातून उद्याचे ग्रँड मास्टर तयार व्हावेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू," असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. 


     स्पर्धेत एकूण ५० खेळाडूंनी सहभाग घेतला. यामधून निवड झालेल्या पोरवाल दर्श, कटारिया विहान, साबळे आरोही आणि शिक्रे अभिशिक्ता हे खेळाडू पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


    या वेळी नगरसेवक  संजय  शेंडगे,  श्याम नळकांडे आणि  सचिन शिंदे यांनी स्पर्धेस सदिच्छा भेट देत उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन दिले.


     स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शांती ज्युनियर्स प्रीस्कूलच्या वतीने अनिकेत कवाष्टे व तनुज रासने यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली.


    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत बापट सर, पारुनाथ ढोकळे, गुजराथी सर, जोशी सर, प्रशांत धंगेकर,  वैभव वाघ, देवेंद्र वैद्य,चेतन कड, कांबळे सर, देवेंद्र ढोकळे, कुद्रे सर, अनुराधा बापट मॅडम आणि मनिष जसवानी यांनी मोलाचे सहकार्य केले.