आधुनिक जीवनात समर्थ विचारांची नवी वाट दाखवणारा ‘समर्थ’

आधुनिक जीवनात समर्थ विचारांची नवी वाट दाखवणारा ‘समर्थ’






समर्थ रामदास स्वामींचे विचार म्हणजे केवळ अध्यात्म किंवा भक्तीपुरते मर्यादित नसून, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची, संकटांना सामोरं जाण्याची आणि योग्य मार्ग निवडण्याची प्रेरणा देणारी विचारसंपदा. याच विचारांचा आधुनिक काळाशी संवाद घडवणारा आगामी मराठी चित्रपट ‘समर्थ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत चाललेली नाती, दोन पिढ्यांमधील विचारांची दरी आणि आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या जीवनमूल्यांचा शोध या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.




‘समर्थ’ची कथा एका सामान्य कुटुंबाभोवती फिरते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होत जाते. एका बाजूला अध्यात्म आणि समर्थ विचारांकडे झुकणारे वडील, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारसरणी असलेला मुलगा, या दोन पिढ्यांमधील मतभेद आणि त्यातून निर्माण होणारा भावनिक दुरावा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा संघर्ष केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर आज अनेक घरांमध्ये निर्माण होणाऱ्या संवादाच्या अभावाचं आणि बदलत्या नातेसंबंधांचं प्रतिबिंब ठरतो.




आधुनिक जीवनातील ताणतणाव, अपेक्षा, नात्यांमधील गैरसमज आणि स्वतःच्या आयुष्याचा अर्थ शोधण्याची धडपड यामधून मार्ग काढताना समर्थ रामदास स्वामींचे विचार या पात्रांना कशी नवी दृष्टी देतात, याचा प्रवास ‘समर्थ’मधून उलगडतो. परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संघर्ष निर्माण करण्याऐवजी या दोन्हींचा समतोल साधत जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.





चित्रपटाच्या आशयाला अधोरेखित करणारं ‘बंध विमोचन राम’ हे भक्तिरसपूर्ण गीतही विशेष ठरलं आहे. समर्थ रामदास स्वामींच्या परमशिष्या संत वेण्णास्वामी यांनी रचलेल्या या अर्थपूर्ण रचनेला ज्येष्ठ संगीतकार केदार पंडित यांनी संगीत दिलं असून, आर्या आंबेकर यांच्या भक्तिरसपूर्ण स्वरांनी गीताला विशेष उंची प्राप्त झाली आहे. भक्ती, समर्पण आणि आत्ममुक्तीचा भाव व्यक्त करणारं हे गीत चित्रपटाच्या आध्यात्मिक भावविश्वाशी जोडलेलं आहे. विशेष म्हणजे, या गीताचं चित्रीकरण समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी आणि समाधिस्थान असलेल्या सज्जनगडावर करण्यात आलं आहे. त्यामुळे या गीताला चित्रपटाच्या कथेशी आणि समर्थांच्या विचारविश्वाशी एक विशेष भावनिक नातं लाभलं आहे.




दिग्दर्शक योगेश फुलफगर म्हणतात,“‘समर्थ’ची कथा मांडताना आजच्या पिढीला सहज समजेल अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामींच्या विचारांकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. एका कुटुंबातील नात्यांमधून उलगडणारा हा प्रवास हळूहळू प्रेक्षकांना एका मोठ्या विचारविश्वाशी जोडतो. उपदेशात्मक मांडणी न करता कथा, व्यक्तिरेखा आणि त्यांच्या भावनांमधून समर्थ विचारांचा अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं.”




निर्माते रविंद्र पाठक म्हणाले,“‘समर्थ’ हा विषय आजच्या काळात अत्यंत आवश्यक असलेल्या विचारांना मोठ्या पडद्यावर आणण्याची संधी होती. आज प्रत्येक कुटुंब आपल्या परीने अनेक बदलांमधून जात आहे. अशा परिस्थितीत नाती, संस्कार आणि जीवनमूल्यांकडे पुन्हा एकदा पाहायला लावणारी ही कथा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहातून बाहेर पडताना या कथेतील एखादा विचार आपल्या सोबत घेऊन जावा, हीच आमची अपेक्षा आहे.”




क्रिएटिव्ह प्रोड्यूसर अमोल भगत म्हणाले,“‘समर्थ’च्या संपूर्ण प्रवासात चित्रपटाचा आशय आणि त्याची भावनिकता प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर आमचा विशेष भर राहिला. चित्रपटातील संगीत, ‘बंध विमोचन राम’सारखं भक्तिरसपूर्ण गीत, कलाकारांची निवड आणि चित्रपटाच्या विविध पैलूंची मांडणी या सगळ्यांतून ‘समर्थ’चं वेगळं विश्व उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. श्रद्धा, भावना आणि सकारात्मक विचार यांचा सुंदर अनुभव प्रेक्षकांना मिळावा, हीच आमची भूमिका आहे.”



थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित ‘समर्थ’ या चित्रपटाची निर्मिती रविंद्र पाठक यांनी केली असून अमोल भगत हे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश फुलफगर यांनी केले आहे. चित्रपटात भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी जमेनिस, हार्दिक जोशी, ईशा केसकर, प्रसाद खांडेकर, राजन भिसे, यतिन कार्येकर, दिशा परदेशी आणि निखिल राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या जीवनाशी जोडणारा, नात्यांची नव्याने जाणीव करून देणारा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारा ‘समर्थ’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.