चोवीस तास वीज पुरवठा खंडित राहत असेल तर बाजारपेठेला कायमचे कुलूप लावायचे का ? : किरण काळेंचा संतप्त सवाल 





काही क्षणांसाठी अवकाळी पाऊस, वादळ सुटलं. परंतु अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण शहराची वीज यंत्रणा मृत होऊन पडली. शहराच्या अनेक भागांमध्ये बारा ते चौदा तास वीज नव्हती. कहर म्हणजे शहराचा आत्मा असणाऱ्या बाजारपेठेत तर तब्बल चोवीस तास वीज पुरवठा खंडित होता. त्यानंतरही विजेचा लपंडाव सतत सुरूच आहे. काही  लोकांना बाजारपेठेला कायमचे कुलूप लावायचं आहे का, असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केला आहे. 




थोड्या वेळासाठी झालेल्या पावसाने संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणात कोलमडून पडल्यानंतर ठाकरे शिवसेनेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काळे म्हणाले, बाजारपेठेसह शहर अधोगतिकडे चालले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माळीवाडा बस स्टँड ते सर्जेपुरा हा बाजारपेठेचा मुख्य रस्ता गायब झाला आहे. मध्यवर्ती शहरातील काही रस्ते खोदून तीन-चार महिने लोटले तरी देखील अद्याप पर्यंत काम पुढे सरकायला तयार नाही. जाणून बुजून बाजारपेठेतील कामे रखडवली जात आहेत. प्रश्नांचा गुंता तयार केला जात आहे. प्रशासन नेमके करते तरी काय ? जाणीवपूर्वक बाजारपेठेला वेठीस धरण्याचा कुणाचा डाव आहे काय ? असं सवाल काळेंनी केला आहे. 



काहींच बाजारपेठ उध्वस्त करण्याचं षडयंत्र : 
शहराच्या उपनगरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी राजकीय नेतृत्वाच्या भागीदारीतून मर्जीतल्या बिल्डरांचे काही प्रकल्प, मॉल नियम धाब्यावर बसवून उभे राहत आहेत. शहराची बाजारपेठ उध्वस्त झाल्या शिवाय त्यांच्या गाळ्यांना गिऱ्हाईक मिळणार नाहीत. म्हणून अनेक दशकांची परंपरा असणारी ऐतिहासिक मूळ बाजारपेठ उध्वस्त करण्याचा षडयंत्र काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने राबविल जात असल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे. 



वीज, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा : 


विजेचा लपंडाव थांबला पाहिजे. पावसाळा सुरू होत आहे. दर शनिवारी बाजारपेठेसह शहरामध्ये महावितरण शट डाऊन घेत असते. या काळात मग नेमका कोणता मेंटेनन्स केला जातो ? मेन्टेनन्स होऊन देखील लाईट गेल्यावर ती तात्काळ पूर्वत का होत नाही ? हे थांबणार नसेल तर महावितरण प्रशासनाचे विरोधात ठाकरे शिवसेना तीव्र आंदोलन छडील असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे. काही भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचा धागा पकडत काळे म्हणाले, भाजपने हे त्यांच्या नेत्यांना, महायुतीच्या लोकप्रतिनिधींना सांगावे. जे लोक 'अर्थ'पूर्ण स्वार्थासाठी पडद्या अडून बाजारपेठेला वेठीस धरतात त्यांचेच कार्यकर्ते लोकांचा कळवळा असल्याचा खोटा आव आणतात, असा टोला काळेंनी लगावला आहे.