श्रीकांत आडेप यांच्या घरगुती गणेशोत्सवात सांस्कृतिक, धार्मिक अन् नैसर्गिक विषयांचा अनोखा संगम

गणरायाच्या देखाव्यातून निसर्गाची हाक ; नेपाळ आपत्तीची व्यथा आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश






नगर : दर्शक । १६ सप्टेंबर २०२६। एकदंत कॉलनी, दातरंगे मळा येथील रहिवासी श्रीकांत आडेप यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा देखावा साकारला आहे. सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक अशा तीन विषयांची सांगड घालत त्यांनी साकारलेल्या देखाव्यातून निसर्गाचे महत्त्व, वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि मानवाचे निसर्गाशी बदलत चाललेले नाते प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.




       देखाव्याच्या सांस्कृतिक भागात पारंपरिक वारली पेंटिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवण्यात आले आहे. ग्रामीण संस्कृती आणि निसर्गाशी असलेले माणसाचे नाते वारली चित्रकलेतून अधोरेखित करण्यात आले आहे. धार्मिक भागात श्री स्वामी समर्थांचे भव्य डेकोरेशन करण्यात आले असून, भक्तिमय वातावरणासोबत अध्यात्मिक संदेश देण्यात आला आहे. तसेच वडाच्या झाडाचे प्रतिकात्मक दर्शन घडवून वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.




      नैसर्गिक आपत्तीवर आधारित सादरीकरण हा या देखाव्याचा विशेष आकर्षणाचा भाग ठरला आहे. नेपाळमध्ये आपत्ती येण्यापूर्वीचा निसर्गरम्य परिसर आणि आपत्तीनंतर निर्माण झालेली भीषण परिस्थिती यातील फरक विविध कटआउट व दृश्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. पुरामुळे उद्ध्वस्त झालेली घरे, नुकसान झालेली वाहने, विस्कळीत झालेले जनजीवन आणि नागरिकांवर ओढवलेले संकट यांची व्यथा या दृश्यांमधून मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर या संकटातून नेपाळ पुन्हा सावरावा आणि नव्याने उभा राहावा, अशी सदिच्छाही या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.

      भारतामध्ये 2020 ते 2026 या कालावधीत घडलेल्या विविध नैसर्गिक आपत्तींची दृश्ये देखील या देखाव्यात दाखवण्यात आली आहेत. विविध आपत्तींमुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती यांचे चित्रण करून निसर्गाचा समतोल बिघडल्यास त्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनाला भोगावे लागतात, हा संदेश देण्यात आला आहे.




        मानव आधुनिक सुख-सुविधांच्या मागे धावताना निसर्गापासून दूर जात आहे. विकासाच्या प्रक्रियेत निसर्गाचे होणारे नुकसान, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा बिघडणारा समतोल याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज या देखाव्यातून मांडण्यात आली आहे. झाडे लावा, झाडे जगवा तसेच निसर्गाची साथ, सुखी जीवनाची साथ असे संदेश देऊन प्रत्येकाने निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




       देखाव्यातील एका विशेष फ्रेममधून निसर्गाचे महत्त्व अधोरेखित करत रस्त्याच्या मधी उभा राहून केक कापण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला एक झाड लावणं केव्हाही चांगलं, असा मनाला भिडणारा संदेश देण्यात आला आहे. उत्सव साजरा करताना केवळ दिखाऊपणापेक्षा पर्यावरण आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा या माध्यमातून देण्यात आली आहे.



      विशेष म्हणजे, श्रीकांत आडेप हे गेल्या पाच वर्षांपासून शाडू मातीची गणेशमूर्ती आपल्या घरी प्रतिष्ठापित करीत आहेत. गणेशमूर्तीचे घरातच विसर्जन करून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. शाडू मातीची मूर्ती आणि घरच्या घरी विसर्जन या माध्यमातून गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. धार्मिक श्रद्धा जपत पर्यावरणाची जबाबदारीही स्वीकारता येते, याचे प्रत्यक्ष उदाहरण त्यांच्या उपक्रमातून पाहायला मिळते.



      गणेशोत्सव हा केवळ सजावट, आरास आणि मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरावे, या विचारातून श्रीकांत आडेप यांनी हा देखावा साकारला आहे. धार्मिक श्रद्धेबरोबरच सांस्कृतिक वारसा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय त्यांच्या देखाव्यातून साधण्यात आला आहे.




       दरवर्षी घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे श्रीकांत आडेप यांचा हा उपक्रम यंदाही लक्षवेधी ठरत आहे. निसर्ग वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि निसर्गाशी असलेले नाते जपा, असा व्यापक संदेश त्यांनी गणरायाच्या माध्यमातून दिला आहे. आधुनिक विकासाच्या वाटचालीत निसर्गाचे महत्त्व विसरता कामा नये आणि पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, हा या संपूर्ण देखाव्याचा मुख्य उद्देश आहे.