कुंभार गल्लीतील महिलांचा अनोखा उपक्रम; कुंडीतील वडाच्या झाडाची १२ वर्षांपासून अखंड पूजा
नगर : दर्शक । दि १ जुलै २०२६ ।
वटपौर्णिमा हा सुवासिनींच्या श्रद्धा, परंपरा आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानला जाणारा सण आज शहरासह जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वडाच्या झाडाची विधीवत पूजा करून सात प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्याची व अखंड सौभाग्याची प्रार्थना महिलांनी केली. शहरातील विविध भागांमध्ये वडाच्या झाडांजवळ महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, चितळे रोड परिसरातील कुंभार गल्ली येथील महिलांनी गेल्या बारा वर्षांपासून जपलेली एक वेगळी परंपरा यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
कुंभार गल्लीतील महिलांनी तब्बल १२ वर्षांपूर्वी एक अभिनव निर्णय घेत आपल्या गल्लीतच एका कुंडीत वडाचे रोप लावले. परिसरात मोठे वडाचे झाड उपलब्ध नसल्याने आणि लांब अंतरावर जाऊन पूजा करण्याची अडचण लक्षात घेऊन, "आपल्याच परिसरात वडाचे झाड वाढवू आणि त्याचीच पूजा करू," असा संकल्प त्यांनी केला. त्यानुसार लावलेल्या त्या रोपाची आजही अत्यंत प्रेमाने व श्रद्धेने देखभाल केली जात असून, प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेला त्याच झाडाची विधीवत पूजा केली जाते.
यंदाही पहाटेपासूनच महिलांनी पारंपरिक वेशभूषेत एकत्र येत कुंडीतील वडाच्या झाडाची पूजा केली. झाडाला हळद-कुंकू वाहून, फुले अर्पण करून धागा बांधत सात प्रदक्षिणा घालण्यात आल्या. अखंड सौभाग्य, कुटुंबाचे आरोग्य, सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी मनोभावे प्रार्थना केली. धार्मिक विधींबरोबरच परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला जात आहे. केवळ पूजा करण्यापुरते झाड न पाहता त्याचे संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारीही महिलांनी स्वीकारली आहे. गेली बारा वर्षे त्या झाडाची नियमित काळजी घेतली जात असून, ते अधिक वाढल्यानंतर त्याचे कायमस्वरूपी वृक्षारोपण याच गल्लीत करण्याचा महिलांचा मानस आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नव्या पिढीलाही वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजत असून, धार्मिक सणांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि पर्यावरणाबद्दलची जागरूकता यांचा सुंदर संगम घडविणारी ही परंपरा आज कुंभार गल्लीची ओळख बनली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने महिला एकत्र येऊन वटपौर्णिमा साजरी करताना धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच "एक झाड लावा, झाडे जगवा" हा संदेशही समाजापर्यंत पोहोचविला. कुंडीतील एका छोट्याशा वडाच्या रोपापासून सुरू झालेला हा उपक्रम आज सामाजिक एकोपा, पर्यावरणप्रेम आणि सांस्कृतिक वारशाचे जतन यांचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com