Kedgao BJP | जुन्या–नव्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची एकमुखी मागणी
Kedgao BJP | नगर : दर्शक । - येणाऱ्या अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगाव मंडलातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. केडगावमधील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. दोन दिवसांपूर्वी शहर जिल्हाध्यक्ष मा. अनिल मोहिते यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत प्रभाग क्रमांक १५, १६ व १७ या तीनही प्रभागांतून जुने व नवे कार्यकर्ते यांचा समन्वय साधून प्रत्येकी किमान दोन उमेदवारांना उमेदवारी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या मनपा निवडणुकीत योग्य न्याय मिळावा, अशी भावना प्रत्येक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
जुने व अनुभवी कार्यकर्ते तसेच युवा कार्यकर्ते यांना समान संधी दिल्यास पक्ष संघटन अधिक मजबूत होईल आणि भविष्यात पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे व शहर जिल्हाध्यक्ष मा. अनिल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली केडगाव हा भाजपचा बालेकिल्ला ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये केडगावमधील भाजप व युतीच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून दिले आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेत जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे भविष्यात जुन्या तसेच नव्या युवा कार्यकर्त्यांना गृहीत धरले जाऊ नये, असा एकमुखी ठराव यावेळी करण्यात आला.
या विषयावर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे व शहर जिल्हाध्यक्ष मा. अनिल मोहिते यांनी कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित प्रमुख कार्यकर्ते :
केडगाव मंडलाध्यक्ष श्री. भरत ठुबे, शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. साहेबराव विधाते, माजी उपाध्यक्ष धनंजय जामगावकर, माजी मंडलाध्यक्ष पंकज जाहागिरदार, माजी मंडलाध्यक्ष शरद ठुबे, चंद्रकांत पाटोळे, विशाल खैरे, विजय गायकवाड, मंगेश खंगले, प्रमोद कुलकर्णी, सौ. संध्या पावसे, युवा मोर्चाचे अजित कोतकर, उमेश ठोंबरे, अक्षय विरकर, शुभम लोंढे, ऋषिकेश मिसाळ, विशाल कर्डिले, मिलिंद भालसिंग आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, जर येणाऱ्या काळात मनपा निवडणुकीत जुन्या, निष्ठावंत व सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी व निवडणूक प्रक्रियेत विचारात घेतले गेले नाही, तर पुढील काळात पक्षाने कार्यकर्त्यांना गृहीत धरू नये, अशी एकमुखी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पक्ष उभा आहे, त्यामुळे त्यांच्या भावना दुर्लक्षित झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com